Vidarbh tiger news |blog
आई बाबा चे प्रेम:-
जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला आईचं आणि बापाचं दोघांचं प्रेम लाभायलाच हवं. दोघांच्याही प्रेमात खूप फरक असतो.. मुलाला जे हवं असतं ते मुलाने मागण्यापूर्वी आईला समजलेलं असतं. बापाला पुष्कळदा ते सांगितल्यावर समजतं. बापाच्या ह्या मनोरचनेमुळे मुलाला हट्ट करून एखादी गोष्ट वसूल केल्याचा आनंद मिळतो. आईचं प्रेम आंधळं, भाबडं म्हणूनच की काय, मुलाचं काही चुकलं तर तो तिला स्वतःचा पराभव वाटतो. स्वतःचं नुकसान झालं असं ती मानते. बापाचं प्रेम डोळस म्हणूनच मुलाच्या हातून होणाऱ्या चुकांचे फटके मुलालाच जास्त बसणार म्हणून तो कासावीस होतो. अंगावर वार झाले तर आईचं प्रेम फुंकर घालतं, पण बाप होणारे वार वरच्यावर अडवू शकतो. म्हणूनच, आईच्या प्रेमाला पारखं होण्याची पाळी आली तर गाभाऱ्यातली समई विझल्यासारखं वाटतं आणि बापाचं प्रेम लाभलं नाही तर त्याच देवळाचा कळस कुणीतरी नेल्यासारखी अवस्था होते. म्हणून म्हटलं, मुलाला दोघंही हवीत. कडाक्याची थंडी पडली की शाल घेऊन भागत नाही आणि नुसतं ब्लँकेट अंगावर असलं तरी पोरकेपणाची भावना तशीच राहते. म्हणून आईच्या शालीचं 'अस्तर बापाने वरून घातलेल्या ब्लॅकेटच्या आत हवं.
- लेखक मानसी रंगारी.
_____________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा .किंवा मला व्हॉटसअप वर मेसेज करा..
हे ही वाचा ,
Comments
Post a Comment